मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

मंगळवेढा (Mangalwedha) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सोलापूर श्रेणी : सोपी
सोलापूर पासून ५० किमीवर सोलापूर-सांगली रस्त्यावरील मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण आहे. चालुक्य,कलचुरी घराण्याची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. विजापूरच्या आदिलशाहीच्या जवळीकीमुळे नेहमीच हे ठिकाण आदिलशाहाच्या काळात महत्वाचे होते. संत चोखामेळा, संत दामाजी या संतांच्या वास्तव्याने मंगळवेढा गाव पावन झालेले आहे. मंगळवेढा गावात आता किल्ल्याचे फ़ारच थोडे अवशेष उरलेले असले तरी, अनेक ऐतिहासिक प्राचीन अवशेष गावात विखुरलेले आहेत. सोलापूरचा किल्ला, मंगळवेढा किल्ला आणि माचणूर किल्ला, सिध्देश्वर मंदिर (माहिती साईटवर आहे) दोन दिवसात सहज पाहून होतात.
8 Photos available for this fort
Mangalwedha
इतिहास :
प्राचीनकाळी पुलकेशी चालुक्याच्या मंगलेश या दुसर्‍या मुलाचा याठिकाणी तळ होता. त्याच्या नावावरून गावास मंगळवेढे नाव पडले असावे. आठव्या शतकात काशीविश्वेश्वराच्या मंदिराची निर्मिती चालुक्यांनी केली असे मानले जाते. त्यानंतर आलेल्या कलचुरींची राजधानी काही काळ या ठिकाणी होती. ते स्वत:ला ब्रम्हाचे वंशज (पूजक) मानत असल्याने त्यांनी याठिकाणी ब्रम्हदेवाचे देऊळ बांधले असावे. आज देऊळ नष्ट झाले असले तरी ब्रम्हदेवाची मुर्ती आजही आपल्याला पाहायला मिळते.
आदिलशहाची राजधानी विजापूर मंगळवेढ्याच्या जवळ आहे. इसवीसन १६६५ साली शिवाजी महाराज यांनी मिर्झाराजे जयसिंग यांचे सोबत आदिलशाही विरुध्द मोहिम काढली. त्यावेळी नेताजीने मंगळवेढा किल्ला जिंकला. हा किल्ला विजापूरच्या जवळ असल्याने तो ताब्यात ठेवणे अवघड असल्यामुळे मिर्झा राजे जयसिंहाने दिलेरखानाला किल्ला उध्वस्त करण्याची आज्ञा केली होती. पुढील काळात मंगळवेढे पुन्हा आदिलशहाच्या ताब्यात गेले. इसवीसन १६८५ मध्ये औरंगजेब बादशाहाच्या बक्षीने उध्वस्त झालेला मंगळवेढा किल्ला ताब्यात घेतला.

मंगळवेढे गावापासून जवळच माचणूर येथे सिद्धेश्वराचे प्राचीन मंदिर आणि माचणूर किल्ला भीमेच्या काठी आहे. याठिकाणी इसवीसन १६९५ ते १६९९ औरंगजेबाचा मुक्काम होता.त्यावेळी औरंगजेब मंगळवेढे येथील जुम्मा मशिदीत नमाज पढण्यासाठी येत असे. मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार झाल्यावर मंगळवेढा किल्ल्याचे महत्व कमी झाले
पहाण्याची ठिकाणे :
आताच्या स्थितीत उभी असलेली वास्तू म्हणजे किल्लेवजा गढी आहे. त्याला चार सुस्थितील मातीचे बुरुज आहेत. सध्या किल्ल्यात उपविभागीय दंडाधिकारी यांचे कार्यालय आहे. किल्ल्याचा खंदक नष्ट झालेला आहे. किल्ल्यात एका कोपऱ्यात काही कोरलेल्या मूर्ती सप्त मातृकांची मुर्ती, गणपतीची मूर्ती पाहायला मिळतात. किल्ल्याच्या आताच्या अवशेषांवरून किल्ला आता आहे त्यापेक्षा मोठा असल्याचे संकेत मिळतात.
किल्ल्याच्या मागील बाजूस असलेले काशीविश्वेश्वराचे मंदिर आणि विहीर पाहण्यासारखी आहेत. मंदिर परिसरातील शिलालेखात १५७२ साली मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आढळतो. विहिरीची रचना सुंदर आहे.काही पायर्‍या उतरल्यावर ब्रह्मदेवाची दुर्मिळ मुर्ती पहावयास मिळते. विहिरीच्या मध्यभागी गावाच्या बाहेर पडणारे भुयार आहे असे गावकरी सांगतात.
गावातील कॉलेज जवळ प्राचीन मंदिराचे कोरीव दगड,खांब, वीरगळ पाहायला मिळतात.
पोहोचण्याच्या वाटा :
मंगळवेढा हे सोलापूर या जिल्ह्याच्या ठिकाणाहून ५० किमी आणि पंढरपूर पासून २३ किमी अंतरवर असल्याने दोन्ही ठिकाणावरुन बसची उपलब्धता आहे.
राहाण्याची सोय :
मंगळवेढा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने राहण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
पिण्याचे पाणी सोबत बाळगावे.

Sorry! There is no fort information available of this category.
Please check back later...