मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
जयगड (Jaigad) | किल्ल्याची ऊंची :  172 | ||
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
जिल्हा : रत्नागिरी | श्रेणी : सोपी | ||
जयगड खाडी जेथे समुद्राला मिळते त्या ठिकाणी दोन किल्ले बांधलेले आहेत. खाडीच्या उत्तर तीरावर असलेला विजयगड किल्ला आणि खाडीच्या दक्षिण तीरावर असलेला जयगड किल्ला आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभे आहेत. जयगड खाडी मार्गे चालणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती करण्यात आली. रत्नागिरी किंवा गुहागर येथून हे दोन्ही किल्ले एका दिवसात पाहून होतात. |
|||
|
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दाराकडे जातांना उजव्या बाजूला पडकोटचे प्रवेशव्दार दिसते. जयगड किल्ला पठारावर वसलेला आहे तर पडकोट खाडी पर्यंत पसरलेला आहे. मुख्य किल्ला पठारापासून वेगळा करण्यासाठी खंदक खोदलेला आहे. या कोरड्या खंदकामुळे शत्रू थेट किल्ल्याच्या भिंतीला भिडू शकत नसे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार बुलंद बुरुजाने झाकलेले आहे. दरवाजावर थेट मारा करता येऊ नये यासाठी अशी योजना करण्यात आलेली आहे. ब्रिटीश काळात या भव्य बुरुजात कार्यालय थाटल्यामुळे मुळच्या मार्यांच्या जागांमध्ये खिडक्या बनवलेल्या आहेत. यामुळे या बुरुजाची मुळची शोभा गेलेली आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार दोन बुरुजांच्या मधे आहे. प्रवेशव्दारावर दोन बाजूला कमळ फ़ुले कोरलेली आहेत तर मध्यभागी कोरलेले व्दारशिल्प अर्धे तुटलेले असल्याने कशाचे आहे ते ओळखता येत नाही. प्रवेशव्रारातून किल्ल्यात प्तवेश केल्यावर दोन्ही बाजूंना देवड्या आहेत. प्रवेशव्दाराला लागूनच तटबंदीत लांबलचक खोली आहे. याची रचना दारुकोठारा सारखी आहे. पण किल्ल्याच्या प्रवेशव्दाराला लागूनच दारुकोठार असण्याची शक्यता नाही. किल्ल्याच्या प्रवेशव्दारावर जाण्यासाठी पायर्या आहेत त्यांनी वर जाऊन बुरुज आणि पायर्या पाहून खाली उतरावे. प्रवेशव्दारासमोर एक तीन मजली उंच इमारत आहे. त्याचे २ मजलेच आता शिल्लक आहेत. त्या इमारतीच्या दिशेने जावे. इमारत पाहून मागे गेल्यावर दोन पाण्याचे मोठे बांधिव हौद पाहायला मिळतत. पावसाचे पाणी साठवण्यासाठी या हौदांची निर्मिती करण्यात आली होती. हौदाच्या बाजूला गणेश मंदिर आहे. गणेशाचे दर्शन घेऊन. समोर दिसणार्या पडक्या वाड्याकडे जावे. या वाड्याच्या उजव्या भागात दोन कमानी आहेत त्या मोडकळीस आलेल्या आहेत. डाव्या बाजूच्या वाड्याची कमान सुस्थितीत आहे. त्याच्या व्दारपट्टीवरील व्दारशिल्प मात्र अस्तित्वात नाही. या वाड्यांच्या मागच्या बाजूस दोन आयताकृती विहिरी आहेत. या विहिरींमध्ये बारामाही पाणी असते. विहिरे पाहून झाल्यावर तटबंदी ढासळलेली आहे त्याच्या पुढे फ़ांजीवर चढावे आणि समोर दिसणार्या मोठ्या बुरुजाकडे जावे. हा बुरुज किल्ल्याच्या एका टोकाला असल्याने त्याला तटबंदीवरुन दोन बाजूला प्रवेशव्दारे आहेत. बुरुज दोन मजली असून त्याला जंग्या आणि तोफ़ांचा मारा करण्यासाठी खिडक्या आहेत. बुरुज पाहून फ़ांजीवरून दुसर्या टोकावरील बुरुजाकडे जावे. इंग्रजांच्या काळात या बुरुजावर साधारण त्रिकोणी आकाराची इमारत बांधलेली आहे. हा बुरुज पाहून झाल्यावर आपण फ़ांजीवरुन जीन्याने खाली उतरावे. पुढे गेल्यावर तटबंदीत खोली सारखी रचा दिसते. त्यातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला खोल्या आणि समोर प्रवेशव्दार दिसते. हे समुद्राच्या दिशेला असलेले प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दाराच्या आतल्या बाजूस देवड्या आहेत. प्रवेशव्दार पाहून बाहेर आल्यावर तटबंदीच्या कडेकडेने गणपती मंदिरा समोर आल्यावर तटबंदीत एक देऊळ दिसते. ते किल्ले बांधणीच्या वेळी बळी गेलेल्या जयबाचे देऊळ आहे. देऊळ पाहून तटबंदीच्या कडेकडेने प्रवेशव्दारापाशी येतांना तटबंदीत एक कोठार पाहायला मिळते. पुढे प्रवेशव्दारा जवळ एक विहिर आहे आणि इंग्रजांच्या काळात बांधलेली टाकी आहे. हे पाहून प्रवेशव्दारातून बाहेर पडून डाव्या बाजूच्या पडकोटाच्या प्रवेशव्दारातून आत शिरावे. या ठिकाणी डाव्या बाजूला कातळ आहे. या कातळावर चढून गेल्यावर टोकाला एक बुरुज आहे. येथून खाडी आणि खालचे बंदर यावर नजर ठेवता येते. बुरुज पाहून आल्या वाटेने प्रवेशव्दारापाशी येउन पडकोटाकडे निघावे. ज्या ठिकाणी उतार चालू होत्तो तेथे डाव्या बाजूला आंब्याची बाग आहे. या बागेला कुंपण घातलेले आहे. बागेत शिरण्यासाठी जेथे अडसर लावलेला आहे तेथून बागेत प्रवेश करावा. थोडे अंतर चालल्यावर डाव्या बाजूला दगडात वरच्या बाजूला एक नैसर्गिक गुहा दिसते. तेथे मोहमाया देवीचे ठाणे आहे. दगडात केलेल्या खाचातूनच वर चढत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते. देवीचे दर्शन घेऊन पुढे गेल्यावर वरच्या बाजूस एक आणि खालच्या बाजूस एक असे दोन वीस फ़ूट उंचीचे दगडी खांब पाहायला मिळतात. आमराई दाट असल्याने खांब शोधणे अवघड जाते. खांब पाहून आल्या वाटेने परत कुंपणापाशी येऊन पडकोट उतरायला सुरुवात करावी ५ मिनिटात आपण पडकोटातील गावात पोहोचतो. गावातून डाव्या बाजूला जाणारी पायवाट पकडावी. यावाटेने ५ मिनिटात आपण पडकोटच्या समुद्राकडील दरवाजात पोहोचतो. दरवाजा जवळ हनुमंताची मुर्ती आहे. दरवाजातून बाहेर पडल्यावर खालच्या बाजूला (समुद्राजवळ)एक विहिर आहे. विहीर पाहून दरवाजातून आत येऊन दरवाजा लगतच्या फ़ांजी वरुन तटबंदीतल्या बुरुजांवर जाता येते. बुरुज पाहून पुन्हा प्रवेशव्दारापाशी येऊन आल्या वाटेने विरुध्द दिशेला चालत जावे. वाटेत डाव्या बाजूला वस्तीत जिर्णोध्दार केलेले शिवमंदिर आहे. पुढे गेल्यावर दक्षिण टोकाचे प्रवेशव्दार आहे. प्रवेशव्दार दोन बुरुजांमध्ये लपवलेले आहे. प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर डाव्या बाजूला खाडी आहे. उजव्या बाजूला किल्ल्याच्या बाहेर पायर्या बांधलेल्या आहेत. या पायर्यांनी थेट किल्ल्याच्या मुख्य प्रवेशव्दाराजवळ जाता येते. याठिकाणी आपली गडफ़ेरी पूर्ण होते. जयगड गावातून किल्ल्याकडे येतांना रस्त्याच्या डाव्या बाजूला काही तुळ्शी वृंदावन आणि समाध्या पाहायला मिळतात. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
1)रत्नागिरी मार्गे :- रत्नागिरी- गणपतीपुळे मार्गे जयगड अंतर ५३ किलोमिटर आहे. रत्नागिरीहून खाजगी वाहानाने किंवा एसटीने जयगड किल्ल्यावर जाता येते. जयगड किल्ला पाहून बोटीने पलिकडील काठावर असलेले तवसाळ गाठावे. तवसाळ जेट्टीपासून १ किलोमीटरवर विजयगड किल्ल्याचा भव्य बुरुज रस्त्यालगतच आहे. 2) गुहागर मार्गे :- गुहागर जवळ गोपाळगड (अंजनवेलचा किल्ला) आहे. तो पाहून गुहागर- वेळणेश्वर - हेदवी मार्गे तवसाळ (अंतर ४८ किलो्मीटर) गाठाता येते. गुहागर ते नरवण दर तासाला एसटी बस आहेत. या बसने नरवण पर्यंत जाऊन पुढे रिक्षाने तवसाळ जेट्टीकडे जाण्याच्या रस्त्यावर (अंतर ६ किलोमीटर) रस्त्याच्या उजव्या बाजूला असलेल्या विजयगडच्या बुरुजापर्यंत जाता येते. पण नरवण पासून विजयगडचे भाडे रिक्षावाले अव्वाच्या सव्वा सांगतात. त्यापेक्षा खाजगी गाडीने वरील सर्व ठिकाणे पाहून विजयगड आणि जयगड हे किल्लेही एका दिवसात पाहून होतात. खाजगी वहान असल्यास रत्नागिरीहून जयगड किल्ला पाहून गाडी बोटीने खाडी पलिकडे जाता येते. तेथुन विजयगड किल्ला पाहून गुहागर मार्गे अंजनवेल (गोपाळगड) किल्ला पाहात येतो. मुक्काम गुहागर, वेळणेश्वर किंवा चिपळूण येथे करता येईल. | |||
राहाण्याची सोय : | |||
राहाण्याची सोय पावस, गणपतीपुळे आणि रत्नागिरीत आहे. | |||
जेवणाची सोय : | |||
जेवणाची सोय जयगड गावात होते. | |||
पाण्याची सोय : | |||
किल्ल्यावर पाणी नाही. | |||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||
वर्षभर |
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: J | जयगड (Jaigad) | जामगावचा किल्ला (Jamgaon Fort) | जंगली जयगड (Jangli Jaigad) | जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad)) |
जंजिरा (Janjira) | जवळ्या (Jawlya) | जीवधन (Jivdhan) |